नाती आणि जबाबदाऱ्या

आजच्या जगात सगळं काही ‘इमेज’ आणि ‘स्टेटस’ वर मोजलं जातं. घरातलं सुख, वैवाहिक आयुष्य, मुलांचं संगोपन हे सगळं लोकांच्या नजरेत परफेक्ट दिसलं पाहिजे, ही जणू अटच झाली आहे. पण त्या चमकदार आवरणामागे किती स्त्रिया, किती पुरुष आतून तुटत आहेत, हे कुणी पाहतं का?

आजही आपल्या समाजात जबाबदारी टाळणाऱ्यांची संख्या जास्त आहे, निभावून नेणाऱ्यांची कमी.
पण दुर्दैवाने दोष मात्र नेहमी निभावणाऱ्यांवरच टाकला जातो.

पती-पत्नीमधील भांडण असो वा नात्यांमधला तुटलेपणा, आपला समाज अजूनही एकाच बाजूने गोष्टी पाहतो. जर एखादं नातं टिकत नसेल तर स्त्रीला दोष "तिने सांभाळलं नाही", "ती जरा समजूतदार असती तर हे झालं नसतं".
पण कोणी विचारतो का की, सांभाळण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर का?
नातं टिकवणं, मुलांना प्रेम देणं, संसाराचा गाडा ओढणं
हे दोघांचं काम आहे, पण आपल्या संस्कृतीने नेहमीच स्त्रीच्या खांद्यावर सगळं ओझं टाकलं.

खरं पाहता नाती ही दोन्ही बाजूंनी जगली गेली तरच फुलतात. एकाने पाणी द्यायचं आणि दुसऱ्याने फक्त सावलीत बसायचं
असं झालं तर झाड कोमेजणारच.
आज खूप बायकांना मुलांना आई-बाबा दोन्ही बनून वाढवावं लागतंय, कारण पुरुष फक्त नावाला ‘बाप’ राहतो. कुठल्याही कारणाने
अहंकार, जबाबदारीची भीती, किंवा दुसरं आयुष्य
तो कुटुंबापासून दूर जातो.

पण इथे खरी ताकद दिसते ती स्त्रीची.
ती आई एकटी असूनही मुलांना प्रेमाचा दान देते, त्यांचं भविष्य उभारते, आणि स्वतःच्या जखमा लपवते.
समाजाला दाखवायला ती हसते, पण रात्री उशिरा एकटी असताना तिच्या डोळ्यांतलं पाणी कुणी पाहत नाही.

आपला समाज मात्र अजूनही तिला प्रश्न विचारतो
"पती नाही का सोबत?"
"मुलांचं काय होणार?"
पण एकदा तरी कोणी विचारतो का त्या मुलांच्या वडिलांना
"का हो, तुम्ही का सोडून गेलात?"
"तुमचं कर्तव्य कुठे हरवलं?"

नाही. कारण आपला समाज अजूनही दोष नेहमी त्याच्यावर टाकतो, जी तुटलेली असूनही उभी आहे.

खरं म्हणजे आज समाजाने आरसा समोर धरायला हवा.
👉 वडीलपण फक्त नावापुरतं नको, कृतीत हवं.
👉 आईला फक्त जबाबदारीची मूर्ती म्हणून न पाहता तिच्या भावनाही समजून घ्यायला हव्यात.
👉 मुलांना प्रेमासाठी भिकाऱ्यासारखं बनवणं थांबवायला हवं.

कारण नाती ही जबाबदारीतून नाही तर खऱ्या काळजीतून आणि निस्वार्थ प्रेमातून जिवंत राहतात.
आणि जेव्हा एक बाजू फक्त सोडून पळते
तेव्हा समाजाने दोष निभावणाऱ्याला न देता पळणाऱ्याला विचारलं पाहिजे.

शेवटचा विचार

आई ही नेहमी आई असते, ती कधीच कमी पडत नाही.
बाबा नावाला नसले तरी चालेल, पण जबाबदारीला नसले
हे त्या लेकराचं दुर्दैव आहे.
आणि हे दुर्दैव घडवणाऱ्यांनाच समाजाने आरसा दाखवला पाहिजे.

#वास्तवदर्शीलेख #समाजाला_आरसा #आईचे_त्याग #बापाचे_कर्तव्य #जबाबदारी #MarathiThoughts #RealisticWriting #भावनिकसत्य

Comments

Popular Posts